Monday, March 9, 2020

सत्त्वपरीक्षा

"फुले म्हणाले","टिळक म्हणाले"..
फेकून द्या तुमचे हे झेले.

तुमचे डोके काय म्हणाले,
तुम्हाला,
हे सांगा पहिले!

पचले नाहीत सावरकर अन्
नाही कळले आम्हा गांधी.

शेखचिल्लीचे वंशज आम्ही,
आदेश येता,तोडू फांदी.

प्रिय घराणे,त्याग तराणे,
किंवा वांशिक वाद पुराणे,

तेच पुन्हा कानांशी कर्कश,
घोटवलेले,प्रचार गाणे.

नव्या युगातील नव्या गड्याला
हवा शिवाजी दाढीपुरता,

नको तितिक्षा,जिद्द नको,
द्या रंगीत झेंडा,गाडीपुरता.

अटकेवर रोवुनिया टापा,
फुरफुरले जे आमचे घोडे,

वाहत ओझे,गाढव बनुनी,
शिरावरी श्रेष्ठींचे जोडे.

संपून गेले,तेथ उकीरडे,
आता मागती आपुले अंगण,

मस्त दुगाण्या झाडून म्हणती,
नव्हते आमचे कधीच भांडण.

टिळा लावुनी,टाळ घेऊनी,
दिसती तुडवत पथ अनवाणी,

नकोच भुलणे,वरल्या रंगा,
धूर्त बिलंदर यांचे पाणी.

सरता उत्सव,तोच दिनक्रम,
नको मना रे भव्य अपेक्षा,

होती,आहे,अन् असणारच,
सामान्यांची सत्वपरिक्षा.

                   .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...