Saturday, March 28, 2020

खरी परीक्षा

वेळ कातरे वेळेला अन्
आम्ही म्हणू की काळ कंठला.

वेळ आल्यावर काळ खुणावे
निमिषामध्ये मिटला खटला.

न्याय कोठला कुणी मांडावा
स्पर्शमात्र अन् घट सांडावा.

भरला ज्याने त्याला माहीत,
कुठला दावा! कुणी भांडावा?

अतर्क्य सारे चुकतो ठोका
क्षणात थांबे जीवनझोका.

धुतले कितीदा हे कर, काया.
संशय मनीचा ये चावाया

इथे तिथे अन् अवतीभवती
गडद दाटते काजळभीती

परि मेघांना विषाक्त काळ्या
किनारती त्या ज्योती धवळ्या.

धन्वंतरीची घेऊन सेना
पहा झुंजती लक्ष्य चुकेना.

खाकी जागी देत पहारा
एकच लाठी परि दरारा.

संयम थोडा धीर जरासा
मनास द्यावा मनी भरवसा.

अंतर राखून राखू अंतर
जपू जाणिवा भेटू नंतर.

भय हे शाश्वत तसे धैर्यही
म्रुत्युंजय मर्त्यांत वीरही!

नियम जगाचा हाच पुरातन
शिशीर संपता वसंत नूतन

तिमीरातून ये दूत उषेचा
तोवर थोडा जोर निशेचा

फोल चळवळी हवी तितिक्षा.
आता आपुली खरी परीक्षा!

                             . 🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...