Thursday, March 12, 2020

स्वराज्य ते साम्राज्य


इतिहासाच्या खुणा शिरावर
मिरवीत सह्यकड्यांचा परिसर.
संगमरवरी,ताज जरी ते,
गडकोटांची त्यांना ना सर.

कातळ,डोंगर गर्द कानने,
घुमती त्यातून ती शिव कवने.
रक्त सांडूनि चूल मांडली ,
फुलली त्यातून मग सुखस्वप्ने.

विसर कसा पडणार गड्या रे,
इथेच पडला बाजीप्रभू तो.
इथेच चिरला अफजल,
गर्जे, नरसिंहापरी शिवप्रताप तो.

मुरारबाजी इथेच नडला,
शीर उडाले तरीही लढला.
कोंढाण्यावर तानाजीचा,
होम होऊनि,भगवा चढला.

बाळाजीचे इथेच कर्तब,
पेशवाईचे वाजे डिंडिम,
बाजीराव तो सदैव झुंजत,
रिपुरक्ताचे लावी कुंकुम.

मरहट्टी हट्टाने,तट्टे,अटकेचेही,पाणी प्याली.
महाराष्ट्राच्या छत्राखाली,राज्य भोगते,तेव्हा दिल्ली.

पानिपताचे देत दाखले,नको निधर्मी ते बदसल्ले,
अब्दाली जरी गेला आता,जिवंत अजुनी,त्याची पिल्ले.

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...