लाल केशरी अन सोनेरी
छटा दाखवीत अशा मनोहर
पश्चिम द्वारी घेऊन स्वारी
जरा थांबतो क्षितिजी भास्कर.
करी उजळणी दिवसभराची,
काय पाहिले,काय राहिले?
कोण उमलले प्रभात समयी
अन माध्यान्ही कोण रापले?
उन्हे उतरता शीतल वारा
हळूच देई सायंचाहूल,
पल्याड डोळे तरी अडखळे,
बुडताना सवित्याचे पाऊल !
कोण पुसे त्या कितवा दिन हा?
कोण पुसे अन किती राहिले?
सापेक्षच हे सारे सारे
काळ टाकतो संथ पाऊले.
तटस्थ! पाही पळ दो पळ अन
होय नाहीसा क्षितिजावरुनी.
औटच घटका राज्य मांडण्या
येते लगबग संध्या राणी..
थवे खगांचे मांडून ओळी
परत कोटरी मग जाताना
निशा खुणावे चांदणगात्री
चंद्रसाक्षी ने नभ सजताना.
राज्य तियेचे स्वप्नसावळे,
अर्धंतंद्र जगतावर चाले,
जाणीव जाता विरले सारे,
सुरु जाहले,म्हणता सरले!
पहा वाजले घुंगुरवाळे
प्रभातरवीचे चिमणे पाऊल,
चक्र संपले,काल कालचे,
आज, उद्याची, देतो चाहूल!
. 🍃संतोष
No comments:
Post a Comment