कधी खूप पूर्वी इथे माड होते
कधी पावसाळ्यात डोलायचे.
कधी मोकळे काही शेजार होते,
मनांपासुनी काही बोलायचे.
कधी खूप पूर्वी इथे झाड होते,
अतां राहिल्या फक्त भुंड्या खुणा
कधी खूप पूर्वी इथे दार होते,
अतां फक्त गेटातल्या सूचना.
कधी खूप पूर्वी इथे लोक होते
गवाक्षांतुनी नेत्र भेटायचे.
अतां उंच त्यांच्या सभोति मनोरे,
न मी जायचे अन् कुणी यायचे!
कधी खूप पूर्वी इथे वाहणाऱ्या,
सुगंधांतुनी काही पोचायचे.
हवाबंद आता तयांना पहारे,
निरोपातुनी फक्त कळवायचे.
कधी खूप पूर्वी इथे श्वास होते,
उरी ध्यास आणीक विश्वास होते.
अतां गोड वार्ता आभासी जगाच्या
मुखवट्यातुनि फक्त खुणवायचे.
नव्हे ही निराशा,नव्हे स्वप्नभाषा,
जुने जायचे अन् नवे यायचे!
परंतु कधी खूप पुर्वी जुन्यांनी
वसे पेरले तेच हरवायचे!
.🍃संतोष
No comments:
Post a Comment