म्हणणं तरी काय तुझं सांग बरं पावसा?
अजून का रे पडतो आहेस यंदा रात्रंदिवसा?
वाहून वाहून तुला झाले मेघही बिचारे
शरद,आश्विन मास गेले विसरून सारे तारे!
माळ्यावरचे रेनकोट,टोप्या आल्या पुन्हां खाली.
मोडक्या तोडक्या छत्र्यांच्याही झाल्या आता ढाली.
गेलास म्हणता येतोस पुन्हा जायचं नाव नाही.
केविलवाणा पावशा पक्षी तोंड चुकवत जाई.
कविता तरी करु कशी लेखणी हातात धरु?
सांगणं तुझं संपत नाही संततधार सुरु.
पाणथळलेले रस्ते सगळेजिकडे तिकडे ओल.
आडोश्याच्या पत्र्यांवरही विनाकारण ढोल.
आता मात्र आळीमिळी,घे मौनाचा वसा!
राहून गेलं पुढील वर्षी बोल बरं कसा!
.🍃संतोष
No comments:
Post a Comment