त्या कुसुंबी कोवळ्या,
कुसुमांस केव्हां नीज आली?
डोलत्या डाळिंबरंगी
कोषिकांची शेज झाली.
वाहत्या वाऱ्यात पारा,
पाचूच्या रानी पळाला,
शांत शितल जलतरंगी,
डुंबुनी वलयी मिळाला.
मखमली मार्गात हिरव्या,
पायवाटा गुप्त झाल्या,
गोड गंधांच्या नशेने,
गुंगुनि का सुप्त झाल्या?
किरमिजी जांभूळनिळा कां,
नभतळ्याचा काठ झाला?
अन् अचानक अभ्रभरल्या
अम्रुताचा माठ झाला!
न्हाण आले नवरसांना,
उमलुनी उन्मेष आला.
मग म्हणाले झाड ओले,
'मज मुलां,संतोष झाला.'
.🍃संतोष
No comments:
Post a Comment