Sunday, August 1, 2021

निरांजनी कळ्यांनो...

 बाबा आमटे यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांचं आत्मचरित्र, समिधा नुकतंच वाचनात आलं.

अफाट अनुभवांनी भारलेलं जीवन.


एका ओळीत मांडायचा प्रयत्न केला तर,

बाबांचे व्यक्तिमत्त्व आकाशाला स्पर्श करणार्या विशाल व्रुक्षासारखं मानलं तर साधनाताई या त्या व्रुक्षाच्या न दिसणार्या जमिनीत स्वतःला गाडून घेतलेल्या मुळ्या होत.

त्या स्वतः अत्यंत आस्तिक होत्या,मात्र विचारांनी सुधारक होत्या.

आनंदवनातील सद्यपरिस्थिती यावर आपण मत व्यक्त करणं औद्धत्याचं होईल परंतु कुटुंबाला एकत्र ठेवणारा साधनाताईंचा आईपणाचा धागा तुटल्यामुळे तर असं झालं नसेल असं वाटून गेलंच!

खालील काव्यरचना  करताना पुस्तकाचा, साधनाताई यांच्या कार्याचा स्वर आत मनात कुठेतरी निनादत होता.

आणि मला समिधा यापेक्षा निरांजनच आठवलं त्यांना पाहून, समिधा जळून जाते, निरांजन शांत तेवत राहते, गाजावाजा न करता...

ईतकी प्रस्तावना त्यासाठी...

( स्वप्नातल्या कळ्यांनो आणि समईच्या शुभ्र कळ्या यातील रुपक घेतले आहे, आशय मात्र वेगळा आहे)

–--------------------///--------------///-------------------------


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा!

होईल गर्द गहिरा काळोख दाट जेव्हां!


माझ्याकडे फुलांचा कैवल्यघोस आहे

किरणांतल्या झुल्यांचा त्यांनाच सोस आहे.


मुक्तांबरी निळ्याचा हा पांघरून शेला,

जो आर्त गीत गातो,त्याचीच ओढ जीवा,


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा!   (१)


सौंदर्य सोनपंखी सुखवर्ख माखलेले,

तरीही तयास वेढे, सारेच आखलेले!


कुरवाळुनी स्वतःला जे गुंतले जरासे

पल्ला सुदूर गेला,उलटून सर्व फासे.


शास्त्रार्थ घोकणारे पांडित्य शुष्क होता,

उधळा रसाळतेचा सद्भक्तीयुक्त ठेवा!


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा! (२)


बोलायवास काही गेलो खरे जगाला,

होताच पाठमोरा गलका अमाप झाला.


पटले न काही तरीही,केले उगाच जेव्हां,

त्या छद्मवर्तनाचा मजलाच भार झाला.


आता उगेपणाला वैराग्य नाव द्यावे?

अथवा निलाजरे हे डोळे उधार घ्यावे?


काहीच बोध नाही,तरीही करू वहाव्वा?


निरांजनी कळ्यांनो फुलणे सुरूच ठेवा!(३)


गिरवावयास काही ती अक्षरे मिळाली,

त्यांच्याच साधनेने,काही ऋते कळाली.


झिजणे जरी चुकेना,तत्वार्थ प्राण ओतू.

वाटा अनंत फिरतो,घरटे उरी परंतु!


मजला उगाळुनी मी मजलाच लेप द्यावा,

आयुष्य चंदनाचे, मरणां सुगंध यावा.


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा! (४)


उष्टावले कितीदा,विषयांत नाही गोडी,

चोथाच सर्व उरला,थकली चरुन घोडी.


हलकेच वात वाही,ती दूरची लकेर!

होईल या तमाची जाणा आता अखेर!


काळीज कापराचे वितळुनिया सुगंधी

आर्तातले अभंग भिनतात सर्व रंध्री.


आता पहाटपावा प्राणांतरी घुमावा,

ओला सुवर्णचाफा श्वासात मोहरावा.


निरांजनी कळ्यांनो,फुलणे सुरूच ठेवा! 

होईल गर्द गहिरा काळोख दाट जेव्हां. (५)


                                  .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...