आश्वस्त इथे मी फिरतो,
नभअश्वत्थाच्या खाली,
ही दिनरजनीची माया,
मजभंवती पिंगा घाली.
ही छाया शितल वाटे,
तरी कसली चिंता दाटे?
इच्छांना फुटतां फाटे,
शतकोटी म्रुगजळसाठे!
अस्तित्व पोळुनि काढी,
तो रवी इथे शिरी धरीला.
परि कधी पहाटे त्याने,
नेत्रांत दीप उजळवला!
नक्षत्रे डुलती कर्णीं,
ती निशानशा अनुभवली,
अन् पिसाट वारा पर्णीं,
अशी रात पिंजुनी गेली.
त्या आकाशाला बंध,
सहजीवन अन् प्रेमाचे.
हळूहळू निळाई चढते
मग श्यामल शामा नाचे.
हे जरी चिरंतन विश्व,
तरी आपणासाठी सीमा!
ती सांजपांखरे वरती,
पुसटशा उमटती प्रतिमा.
ते स्विकारावे सत्य,
ऋत्मंगल संध्याकाळी!
विश्रांत मनाने चित्तां,
द्या क्रुतार्थतेची टाळी.
हे सांगा जाता जाता,
दशदिशास्तंभदंभाला!
जरी क्षुद्र जीव हा माझा,
रसरसता प्राण उशाला.
रवीचंद्रांचे आकाश
कधीकधी पोरके होते!
आधारवडाला टेकू,
मग पारंबीही देते..
.🍃संतोष
No comments:
Post a Comment