निसर्ग कविता सहज स्फुरावी
निसर्ग तसला उरला नाही.
गच्च दाटल्या जलदांमाजी
दंश विजेचा उरला नाही.
कडकड होते ,गडगड होते
पाऊस सुद्धा पडतो रिमझिम.
परंतु पाचूच्या गात्रांवर
गोड शहारा उरला नाही.
काळा कापूस पिंजत वारा,
खाली नाचरा मोर पिसारा.
पुस्तकातल्या या गाण्यांचा
स्पर्श निरागस उरला नाही.
नवीन गोष्टी,नवीन गाणी,
नव्या नव्याची सतत मागणी,
रुजल्या बीजांचाही आता
तसा सोहळा उरला नाही.
अंगी अपुल्या आखलेलेपण
तयार घोडा,त्वरा सदाची.
निसर्ग सोडा जीव ही अपुला
आता सोवळा उरला नाही.
कबूल शतदा तरी पुन्हा हे
स्वप्न पोपटी फुलारते,पण,
मन हे भोळे म्हणे स्वतःला
शब्द कोवळा उरला नाही.
जुने जूनपण,नवीन नखरे
या कात्रीतच जीवपाखरे,
कसे उडावे या पंखांतच
जोम पूर्वीचा उरला नाही.
निरर्थकातून अर्थ शोधती
अशा गावचा मी रहिवासी,
घडून गेले बरे नि वाईट,
खेद तयाचा उरला नाही.
.🍃संतोष
No comments:
Post a Comment